स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्र मैत्रिणीसाठी ही कविता !
आपण संघर्ष करत असलो तरी त्याच यश हे परिक्षेच्याच निकालाशी संलग्न आहे असे नाही.
वैचारिक कक्षा रुंदवणे,सर्वसमावेशकता येणे,तर्कसंगत मत मांडणे,डोळसपणे नाण्याच्या दोन बाजू पाहणे ही देखील याचीच फलश्रुती आहे.
आपल्याला मिळालेला अनुभव हेच आपला यश माना.अपयश आल्यास ध्येय सध्यातेचा मार्ग बदला पण मार्ग सोडून टोकाचे पाऊल उचलू नका.तुम्हा सर्वांना आणि स्वप्नीलला ही कविता अर्पण !
धीर सोडू नको
मेहनतीने मांडलेला डाव,अर्ध्यावरती मोडू नको
प्रसंग बाका आहे मित्रा,पण तू धीर सोडू नको
स्वप्न उराशी बाळगून,सोडला तू रे गाव
परिस्थितीशी झुंजून,सोसले टाकीचे घाव
कर्तृत्वाने लिहिलेली गोष्ट,अशी हाताने खोडू नको
प्रसंग बाका आहे मित्रा, पण तू धीर सोडू नको
बापाच्या डोळ्यातली काळजी,आईची वेडी माया
तुझ्यासाठी चंदना परी झिजवली त्यांनी काया
आशेची ज्योत मालवून,नाते नैराश्याशी
जोडू नको
प्रसंग बाका आहे मित्रा,पण तू धीर सोडू नको
रहा उभा रोखून नजर अन्यायाकडे थेट
आण बळ मनगटात घे आव्हानांची भेट
नियतीने केलेल्या अन्यायाला कवटाळून रडू नको
प्रसंग बाका आहे मित्रा,पण तू धीर सोडू नको
भारत (हिमांशू टेंभेकर)