Thursday, April 13, 2023

आंबेडकर म्हणजे ?

 आंबेडकर म्हणजे 

परीपूर्ण विद्याव्यासंग आहे 

आंबेडकर म्हणजे

घटनेचा मूलभुत अंग आहे 


आंबेडकर म्हणजे

स्थितप्रज्ञेतेची किनार आहे

आंबेडकर म्हणजे 

विरोधी बंडाची पुकार आहे 


आंबेडकर म्हणजे 

अचूक अस विश्लेषण आहे 

आंबेडकर म्हणजे

जाज्वल्य असे लेखन आहे 


आंबेडकर म्हणजे

ज्ञानाचा विश्वविजय आहे

आंबेडकर म्हणजे

समता संघर्षाचा उदय आहे


आंबेडकर म्हणजे

हक्काच्या न्यायाची हमी आहे 

आंबेडकर म्हणजेच 

मानवता जपणारा तू अन् मी आहे


भारत (हिमांशू)

Saturday, April 8, 2023

लिहीन म्हणतो


अनेक झाल्या करुनी तशा प्रेमावर कविता 

आता नव्या क्रांतीचे, विचार लिहीन म्हणतो


गंजत चाललं आहे आता समाजमन पुन्हा

त्यांना मी विवेकाची, पुकार लिहीन म्हणतो


उघड्या व्यवस्थेची लक्तरे रोज टांगणीला 

समाजमान्य तो,अत्याचार लिहीन म्हणतो 


श्रीमंतास देवळात भेटे भगवंतही त्वरेने

दारिद्र्याशी केलेला, करार लिहीन म्हणतो


सगळे गुंगलेले दिखाऊ दूनियेमध्ये पण

भूवरील प्रत्यक्ष, समाचार लिहीन म्हणतो 


समतेच्या मारुनी गप्पा दुर्लक्षिले शोषिताना

सत्तेपुढे शहाणपण, लाचार लिहीन म्हणतो 


भेद मांडले सारे लिंग,जाती,धर्म नी पंथाचे

पण मी माणुसकीचा,दरबार लिहीन म्हणतो 

  

जोडून हाथ झाले आपल्याच हक्कांसाठी 

त्याच हातांमध्ये मी,तलवार लिहीन म्हणतो


असत्याच्या पुष्पमाला तुम्हास लख लाभो 

अंगी संघर्ष खुणांचा,शृंगार लिहीन म्हणतो  


विविध रंगी झेंड्यांचे संघर्ष होतात येथे  

एकच रक्ताची लाल,धार लिहीन म्हणतो 


नैतिकता लयास गेली,गेली वाहून तत्वे 

सभ्यतेला पडलेले, खिंडार लिहीन म्हणतो


रंजल्या नी गांजल्यांच्या वेदना कळती कुणा

त्यांसाठी शब्द करून,धारधार लिहीन म्हणतो 


थंडावल्या अस्मिता येथे,इमान गहाण गेला

मनाच्या यज्ञातला तप्त,अंगार लिहीन म्हणतो 


अन्याया विरुद्ध बोलणे गुन्हा ठरवेल कोणी 

पुन्हा इन्कलाबाचे, मी उद्गार लिहीन म्हणतो


भारत (हिमांशू)

Thursday, March 30, 2023

श्री रामचंद्र

 श्री राम , मर्यादा पुरुषोत्तम राम , सिया वर राम अनेक नाव पण त्याच बरोबर व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा ! 

नुसत प्रेम करायचं नाही तर त्यासाठी धनुष्य सुध्दा मोडण्याची मनगटात ताकद बाळगावी हा संदेश देणारे राम ! आजच्या पिढीला किती लागू होत हे आपल्या ह्या भौतिकता वादाकडे झुकलेल्या जीवनात आपल्या लोकांच्या प्रेमासाठी काय काय करतो आपण हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा.प्रेम तर होणे सोपे पण जबाबदारी समजून ते निभावणे तेव्हढेच कठीण सध्या प्लास्टिक प्रेमाची सवय झालीय लोकांना ! आपल्या हिशोबाने ते वळायला हवं पण प्रेम हे दुहेरी असत त्यात काही अंशी स्वतःला मी पण बाजूला ठेऊन. कुणाच्या तरी आत्म्याशी एकरूप व्हावे लागते.सध्याच्या धकाधकीच्या आणि वेगवान जगात आपण आपल्या जवळच्या लोकांशी साधं नीट संवाद साधत नाही एकरूपता तर राहूच द्या.


कुटुंबवत्सल रामाचा सध्या एकही गुण आपण घेऊ शकतो का ?वडीलांच्या एका वचनाखातर आपल्या संपूर्ण ऐश्वर्य आणि अधिकारावर तुळशीपत्र ठेवणारा राम जितका महत्त्वाचा तितकाच मोठ्या भावाच्या पादुका गादीवर ठेऊन राज्य करणारा भरत देखील महान म्हणावा लागेल.आज बांधावरून भाऊकीमध्ये होणारे वाद आणि त्यातून चक्क एकमेकांच्या जीवावर उठलेली ही मंडळी पाहिली की त्यांना लहानपणी हे रामयाणातले धडे मिळाले नाही का असा प्रश्न पडतो.

बर त्यात आज वैयक्तिक स्वातंत्र्याच वलय बरच वाढल आहे त्यामुळे जोडीदाराच्या आई वडिलांची अडचण होणे साहजिक आहे.त्यात आपल्या साथीदाराने घर सोडण्याचा घेतलेला निर्णय अर्धांगिनी म्हणून पूर्ण  करण्याचा सीतेचा हट्ट कौतुकास्पद आहे.नाहीतर राजेशाही थाटात वाढल्यावर दोन कापडा सकट घराबाहेर पडायला काळीज खूप मोठं असावं लागत.

सर्वसमावेशक वृत्ती प्रभू रामचद्रांच्या कडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.केवटाची नाव असो की वानारांची सेना,शबरीची उष्टी बोर का असेना रामाने त्यांचा आनंदाने स्वीकार केला.आजच्या देशातल्या काही घटना ही सर्वसमावेशकता लोप पावल्याचे द्योतक आहेत.स्मित हास्य आणि निर्मळ मनाने लोकांना आपलंसं करता येत हे आपण शिकायला हवं.

रामाच्या हातातला धनुष्य आणि ते रौद्र रूप हे त्यांचं मूळ स्वरूप नाही.कायम हास्य वदनाने परिस्थितीला सामोरं जाणे,आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संघर्ष करणे,आपल्याला माया लावणाऱ्याना जीव लावणे ह्यातच खर जीवनाचं प्रेयस आहे.ते मर्कट असो की कोटी खार प्रत्येकाला आपल्याला काय मिळेल ह्या पेक्षा मी काय करू शकतो याचा विचार मनात येतो हे खऱ्या अर्थाने राम राज्याचं लक्षण आहे आणि हेच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दिसून येत. मावळमध्ये मोहिमेवर जाण्यासाठी लागणारी स्पर्धा आणि स्वराज्यासाठी असणारी तळमळ ही निःस्वार्थी भावनेतूनच येत.

मग धनुष्य हाती घ्यावा की घेऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो तेव्हा प्रत्येक वेळी धनुष्य घेऊन राम कधी उभा राहिला नाही आधी सागराला हाथ जोडून केलेली विनंती ऐकली नाही तेव्हा रामाने धनुष्यावर बाण चढवला हे ध्यानात राहू द्यावे.आपल्यावर अन्याय झाल्यावर आणि अधर्म झाल्यावर आपण संघर्ष सज्ज व्हावे हा तो संदेश पण मग संकट हे खऱ्या अर्थाने आलेलं असावं कोणी भीती निर्माण करून तयार केलेलं आभासी नसावं.अवघे विश्वची माझे घर म्हणणारे आपण कुठलाही मानवनिर्मित चौकटीत अडकून राहू नये हीच रामायणाची खरी शिकवण आहे.

खरे पाहता प्रभू श्रीराम ही मुळी व्यक्ती नाहीच ते स्थिर आणि संपूर्ण मनाचं प्रतीक आहे आणि धनुष्यबाण हा त्या मनाचा संयम ! मारुती राया म्हणजे ह्या मनाचे धैर्य ,लक्ष्मण म्हणजे विश्वास! ह्या गुणांच्या सहाय्यानेच आपल्याला अडचणींचा सागर पार करता येतो आणि सीता रुपी प्रेमाने पूर्णत्व प्राप्त करता येते. खर राम हे व्यक्तिमत्त्व साकार होत आणि म्हणूनच सियावर रामचन्द्र हे नाव सार्थ ठरते.

तेव्हा रामराज्य हे राष्ट्र पटलावर अमलात आणण्या आधी मन पटलावर आणि वैयक्तिक आयुष्यात अमलात आणायला हवे.शेवटी सुज्ञ व्यक्तितून समाज आणि समाजातून राष्ट्रीय चारित्र्य घडत असतो.

भारत (हिमांशू टेंभेकर)